Free for download only on 4th and 5th March 2020

Monday 12 June 2023

चार्ली परत येतो

 


हिमालयातून आल्यापासून खूप शांत वाटत आहे. अस्वस्थता दूर झाली. पण मला आज त्या अस्वस्थेची पण आठवण येते आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी मी अस्वस्थ होतो प्रचंड. सगळीच अनिश्चितता होती. त्या मनस्थितीत मी 'चार्ली परत येतो.’ ही कथा लिहिली. संपादकांकडून खूप वाह वाह मिळाली त्या कथे मुळे. आजच्या माझ्या शांत, समाधानी मनोवृत्तीत मी लिहू शकलो असतो का 'चार्ली परत येतो' सारखी कथा? नाही, नक्कीच नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी जे आवश्यक असते ते आणि फक्त तेच मिळत असते. मग ते सुखदायी असेलही नसेलही. उद्विग्न मनस्थितीत तळ्याकाठी बसून 'चार्ली परत येतो' लिहिणे ही माझ्या आयुष्यातील सुंदर आठवणीपैकी एक आहे.



गोष्टी सोडून द्यायला शिका.’ असे आपण अनेक वेळा सांगतो ऐकतो. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक, प्रसंग असतात की ज्यांनी आपल्याला धरून ठेवलेले असते. कितीही सोडायचे म्हटले तर सुटतच नाही आणि मनाला त्रास होतो. हिमालयात जाऊन आल्यावर मात्र सगळे आपसूक सुटाय ला लागले, गळायला लागले.


अलीकडेच माझा एक मित्र बदली होऊन माझ्या गावी आला. आमच्या आणखीन एका मित्राने त्याला सांगितले की महेश कडून तुला खूप काही शिकायला मिळेल. जेव्हा मला त्याने त्या बाबत सांगितले तेव्हा खूप हसू आले. गुरु बनण्या बाबत श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात.

The profession of a teacher is like that of a prostitute. It is the selling of oneself for the trifle of money, honour and creature comforts. For such insignificant things it is not good to prostitute the body, mind and the soul, the means by which one can attain God. A man once said about a certain woman: ‘Ah! She is having a grand time now. She is so well off! She has rented a room and furnished it with a couch, a mat, pillows and man other things. And how many people she controls! They are always visiting her.’ In other words, the woman has now become a prostitute. Therefore her happiness is unbounded. Formerly, she was a maidservant in a gentleman’s house; now she is a prostitute. She has ruined herself for a mere trifle.

जेव्हा जेव्हा कुणी तरी मला म्हणते की तूच माझा गुरु आहेस, तेव्हा ठाकुरांचे वरील शब्द मला आठवतात.



सध्या जुबिली ही वेब सिरीज पाहत आहे. तीन भाग झाले पाहून. देविकारानी बॉम्बे टाकीज, राज कपूर, नर्गिस यांच्या जवळ जाणारी पात्रे पहिली. फाळणी आणि फिल्म इंडस्ट्री यांची मीण घालणे जरा नाही चांगलेच अवघड आहे. आता पर्यंत फाळणी खुशवंत सिंग, अमृता प्रीतम, मन्तो अशा लाडक्या लेखकांच्या मार्फत अनुभवलेली, त्याची आतडे पिळवटून टाकणारी दाहकता लेखणीतून हृदयापर्यंत पोचलेली. तिचे असे उथळ व वरवरचे चित्रण पचवणे जरा जडच गेले. फाळणी झाली म्हणून तवायफ असलेली नायिका लखनऊ वरून मुंबईला का येते, आणि अगदी modern, तोकडे कपडे घालून एकटीच क्लब मध्ये नाचायला जाते हे ही अवघड. तवायफ आणि वेश्या यात फरक आहे. तवायफ या अतिशय सुसंस्कृत व बुद्धिमान असत. चांगल्या घरातील मुलींना त्यांच्या कडे आजच्या भाषेतले ग्रूमिंग lessons घ्यायला पाठवले जायचे. बहुंतांश जणी गाणी रेकॉर्ड करणे आणि नंतरच्या काळात सिनेमात काम करणे चांगले काम समजायच्या नाहीत आणि म्हणून त्यास त्यांचा विरोध असायचा. त्या एखाद्या धनिकाचा आधार घेऊन निश्चित राहत, पण त्याच्याशी एखाद्या पतिव्रता स्त्री इतक्या प्रामाणिक राहत. त्या देहविक्रेत्या नक्कीच नव्हत्या.



सानिया कधीच disappoint करत नाही. तीन मैत्रिणीची कथा, त्यातली एक लेस्बिअन म्हटल्यावर वाटले की आपली आवडती लेखिका formula वापरून पल्प फिक्शन तर नाही लिहायला लागली. पण पुस्तक वाचल्यावर काही तरी छान वाचल्याचा आनंद नक्कीच मिळाला. नसेल ती स्थलांतर इतकी सुरेख, पण निश्चितच छान.



माझ्या आवडत्या लेखकांची पुस्तके मी परत परत वाचतो. नावेच सांगायची झाली आवडत्या लेखकांची तर खुशवंत सिंग, शरदचंद्र, अरुंधती रॉय, सानिया, के आर मीरा, पेरूमल मुरगन, शशी देशपांडे, आर के नारायण, अनिल अवचट. मागच्या महिन्यात दिल्लीला जाऊन आलो. माझा पक्का दिल्ली वाला मित्र राहुल याने मला दिल्ली टूर मध्ये न दाखवली जाणारी काही ठिकाणे दाखवली जसे की हौज खास किल्ला. आता पर्यंत केवळ पुस्तकातच ज्या बद्दल वाचले होते त्या हुमायुन्स टुंब आणि लोधी गार्डनलाही भेट दिल्ली. मग काय? परत आल्यावर खुशवंत सिंगांची कादंबरी दिल्ली घेतली तिसऱ्यांदा वाचायला आणि हरवलो भागमतीच्या आयुष्यात आणि दिल्लीच्या इतिहासात. लेखक आणि त्याची कुरूप तृतीय पंथी मैत्रीण भागमती ह्यांची ही प्रेमकहाणी दिल्लीचा इतिहास ही सांगून जाते. ही कादंबरी लिहायला त्यांना पंचवीस वर्षे लागले. कादंबरीतील काही काही प्रसंग वाचताना मजा येते. जसे की लेखक व भागमती दिल्लीच्या पुरातन वास्तूंना भेट द्यायला निघतात तेव्हा थर्मास मध्ये कॉफी भरून घेऊन जात असतात. त्या काळी असे बाहेर चहा कॉफीचे stall नसायचे. घरातूनच चहा कॉफी थर्मास मध्ये भरून न्यायची. आज किती गम्मत वाटते ना हे वाचताना? बाहेर जाताना चहा कॉफी सुद्धा न्यायचे म्हणजे जरा अतीच, माझ्या पिढीच्या विचारा पलीकडले? आणि ते गरम राहत असेल का त्या थर्मास मध्ये? कदाचित सिंग साहेबांनी परदेशातून आणला असेल खास थर्मास.



निवाला तिच्या मैत्रिणीकडे खेळायला सोडले आणि मी माझ्या मित्राकडे गप्पा मारायला निघून गेलो. घरी आल्यावर निवाने मला सांगितले की परीचे आजोबा वारले. त्यांचा फोटो लावला होता. त्याला हार घातला होतो. मृत्युची अशी तिला सहज सोपी झालेली ओळख मला आवडली. नाही तर आम्ही लहान असताना कुणी वारले तर लहान मुलांना तेथून दूर ठेवण्यासाठी केवढा आटा-पीटा केला जायचा. खरेच We all are born intelligent, but education spoils us.



Saturday 3 June 2023

सुरवात Suruvat

या महिन्यात चाळीस वर्षे पूर्ण होतील मला. त्या निमिताने काही लिहायला घेतले होते. पण मग मनात कल्पना आली की आपण एक साप्ताहिक blog का लिहू नये. मी काय वाचतो आहे, काय करतो आहे हे का share करू नये? त्या मुळे कुणाला काही नवीन इनसाइट्स मिळत असतील तर चांगलेच आहे की! नाही तरी चाळीशी नंतर आता आपण जमा केलेले अनुभवाचे शंख शिंपले मुक्त पणे वाटायलाच हवेत.



दोन आठवडे मस्त हिमालयात राहून आलो. भर उन्हाळ्यात तिथे काय थंडी. मे महिन्यात स्वेटर टोपी घालण्याची मजाच निराळी. आता इथे येऊन घामाच्या धारा. तरीही मन रेंगाळतेय हिमालयात. परत जाण्याची ओढ लागली आहे. सप्टेंबरमध्ये जाऊ का ऑक्टोबरमध्ये याचे ठोकताळे बांधणे चालू आहे. असे काय मिळाले मला हिमालयात? नेहमीच्या ट्रिप पेक्षा ही सहल कशी वेगळी होती? शब्दात सांगणे अवघडच. पण शोध संपला, समाधान लाभले असे मात्र नक्की सांगेन.



लेखन जीव की प्राण. आतून स्पुरते आणि बोटातून उतरते, फार काही विचार नाही, planning वगैरे तर अजिबातच नाही. दिल की बातो मे planning काम नाही करती. मराठीत एवढे लिहीन, चांगले लिहीन, वेगळे लिहीन - कधी विचारही केला नव्हता. माझा एक मित्र आहे दिल्लीत. त्याचे नाव अमोल. तर ह्या अमोलचे एक पेटंट वाक्य आहे , ‘let things happen organically.’ मलाही पटते आहे ही philosophy. आयुष्यात आपण हात धुवून एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो आणि कधी ध्यानी मनीही नसलेल्या गोष्टी अगदी अलगद कवेत येऊन जातात.



तर सध्या काय वाचत आहे माझी आवडती लेखिका सानिया हिचे आवर्तन पुन्हा वाचायला घेतले. आठवड्याच्या मध्येच तिचेच नवे पुस्तक निरंतर वाटेवर टपालाने आले. काय मस्त लिहिते ही बाई. आणि हे मी त्या माझ्याच गावच्या आहेत म्हणून तर अजिबात म्हणत नाही. पण माझ्या आवडत्या लेखिकेत आणि माझ्यात बरेच काही सामान आहे, ही भावना नक्कीच सुखावणारी आहे.



शनिवार, रविवार लोकसत्ता वाचणे म्हणजे तर पर्वणीच. सध्याच्या घडीला सगळ्यात शुद्ध मराठी भाषा वापरणारा एकमेव पेपर आहे हा. आपली भाषा किती समृद्ध आहे याची पदोपदी जाणीव होते वाचताना. शिवाय लेखही अभ्यासपूर्ण, विविधांगी. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मराठीत लिहायला, वाचायला बोलायला हवे.


इंग्लिश मध्ये माझा आवडता पेपर खरे तर हिंदुस्तान टाईम्स. (मी त्यात लिहिले आहे म्हणून नाही) पण मुंबई पुण्याबाहेर तो मिळत नाही. इंडिअन एक्स्प्रेस ही छानच. आता त्यांनी पाने कमी केली हीच एक तक्रार. त्यांच्या अनेक जुन्या पुरवण्या, कात्रणे मी जपून ठेवली आहेत. दर बदलीला त्याचे sorting करून जड अंतकरणाने काही अंक दूर करावे लागतात. पण संपूर्ण संग्रह टाकून देण्याचे मात्र माझे धारिष्ट्य कधीच जाहले नाही.


बरं, नवीन फोन घ्यायचा आहे. मोठा display हवा, 128GB ram हवा आणि २५ हजार पेक्षा महाग नको. काय म्हणता कोणता घेऊ?